MLA Rohit Pawar: कुकडीच्या आवर्तनासाठी मागणी नोंदवलेल्या 100% गावांना पाणी, अनेक गावांच्या बंधाऱ्यात इतिहासात पहिल्यांदाच पूर्ण दाबाने आले पाणी!

MLA Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांनी दिलेला शब्द तंतोतंत पाळत कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी प्रकल्पातून १ ते २३ जानेवारी या वेळेत यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन सोडले. विशेषतः आवर्तन सोडण्यापूर्वी गेट दुरुस्तीसह देखभाल-दुरुस्तीची इतरही कामे पूर्ण केल्याने अनेक चाऱ्यांना पहिल्यांदाच पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कुकडी प्रकल्प हा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. आजवर कधीही शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आवर्तन सोडण्यात येत नव्हते. मात्र रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर या प्रश्नात लक्ष घातले आणि शेतकरी व अधिकारी यांना विश्वासात घेऊन पाण्याचे नियोजन करण्यास सुरूवात केली. परिणामी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन होऊ लागले आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. या वेळीही यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन १ जानेवारीला सोडण्याचे नियोजन त्यांनी शेतकरी व अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीत केले आणि त्यानुसार आवर्तन सोडण्यात आले. कुकडी कॅनॉलचा कर्जत तालुक्यातील ५४ गावांना फायदा होत असला तरी या सर्व गावांतील शेतकऱ्यांना कधीही पाणी मिळत नव्हते. परंतु आमदार रोहित पवार यांच्या नियोजनामुळे या आवर्तनासाठी ज्या गावांनी पाण्याची मागणी नोंदवली त्या शंभर टक्के गावांना पाणी देण्यात आले.

ad

‘टेल टू हेड’ फायदा

चाऱ्यांमध्ये झाडे-झुडपे उगवल्याने आणि त्यांची स्थिती योग्य नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत होती. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी शासकीय खर्चासोबतच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गेटची व चाऱ्यांची दुरुस्ती केली. त्यामुळे ‘टेल-टू-हेड’ अशा सर्व शेतकऱ्यांना पहिल्या दिवसापासूनच पूर्ण दाबाने पाणी मिळाले. मुख्य कालवा आणि चिलवडी कालव्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले. अवर्तनापूर्वी चिलवडी शाखा कालव्यावर गेट बसवण्यात आले तसेच डीप कट मधील गाळ काढण्यात आल्याने चिलवडी शाखा कालव्यातून शेतकऱ्यांना प्रथमच पूर्ण दाबाने पाणी मिळाले. परीटवाडी येथील बंधारे १० वर्षानी प्रथमच या पाण्याने भरून घेण्यात आले. राशीन येथील शेवटच्या चारीला पूर्ण दाबाने पाणी मिळाले. सोनाळवाडी येथील जाधव वस्तीवरील बंधाऱ्यातही इतिहासात पहिल्यांदाच कुकडीचे पाणी देता आले. कर्जत शाखा कालव्यावरील कोरेगाव, गलांडवाडी, रजपूत मळा, जळकेवाडी, चापडगाव, पाटेवाडी या गावांनाही पूर्ण दाबाने पाणी मिळाले. 

कान्होळा नदीवरील नेटकेवाडी, धांडेवाडी, कोरेगाव, बजरंगवाडी, खातगाव, लोणी मसदपूर, आंबीजळगाव येथील बंधाऱ्यात पूर्ण दाबाने पाणी सोडण्यात आले. राक्षसवाडी बुद्रुक आणि राक्षसवाडी खुर्द या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या १५ नंबर चारीवरील शेवटच्या शेतकऱ्यांना कधीही पाणी मिळत नव्हते. परंतु यावेळी त्यांनाही पाणी मिळाले. येसवडी शाखा कालव्यावरील सर्व गावांना पूर्ण दाबाने पाणी देण्यात आले. येसवडी तलावही कुकडीच्या पाण्याने प्रथमच भरण्यात आला. करमनवाडी येथील शेतकऱ्यांना कधीही पूर्ण दाबाने पाणी मिळत नव्हते, ती अडचणही दूर झाली. बारडगाव येथील आप्पाजी बुवा तलावही भरुन घेण्यात आला. 

शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी पाणी मिळाले पाहीजे, असा माझा प्रयत्न राहिला. त्यासाठी शेतकरी आणि अधिकारी यांच्या एकत्रित बैठका घेऊन पाण्याचे नियोजन केले. चाऱ्यांची दुरुस्ती, डीप कटमधील गाळ काढणे, आवश्यक तिथे गेट बसविणे ही कामे केली. त्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनीदेखील सहकार्य केले व आवश्यक ती मदतही केली, त्याबद्दल त्यांचे आभार. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच यापुढेही पाण्याचे नियोजन केले जाईल. – रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top