Assurances given in the Assembly elections : विधानसभा निवडणुकीत केलेली आश्‍वासनांची खैरात आणि दाखवलेल्या खोटया स्वप्नामुळे जनतेत अविश्वासाचे वातावरण निर्माण – माजी मंत्री राम शिंदे

 विधानसभा निवडणुकीत केलेली आश्‍वासनांची खैरात आणि दाखवलेल्या खोटया स्वप्नामुळे जनतेत अविश्वासाचे वातावरण निर्माण माजी मंत्री राम शिंदे

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि जनतेच्या आशिर्वादाने कर्जत शहरासाठी आपण राज्याच्या तिजोरीतून १५१ कोटी रुपयांचा निधी  उपलब्ध करू शकलो. आणि गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून कर्जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मनापासून प्रमाणिक प्रयत्न केला . या उलट गेल्या दोन वर्षांत विद्यमान लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीत केलेली आश्‍वासनांची खैरात आणि दाखवलेल्या खोटया स्वप्नामुळे जनतेत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे मत माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

या पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुका अध्यक्ष डॉ सुनील गावडे,शहर अध्यक्ष वैभव शाहा,युवा मोर्चा चे उपाध्यक्ष पप्पूशेठ धोदाड, अनील गदादे आदी उपस्थित होते. 

पुढे राम शिंदे म्हणाले की, कर्जत शहरासाठी कुठलेही भरीव काम करता आले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्या पासून ते रडीचा डाव खेळत आहेत  हे  कर्जतच्या जनतेला कळले आहे. राजकीय इर्षेला पेटुन सुडाच्या, कुटील दबावाच्या, राजकारणातून  त्रासदायक चित्र निर्माण केले, हे सर्व जनतेने पाहिलेच आहे. परंतु एवढे होऊनही  विजयाची खात्री नसल्याकारणाने व पराभव समोर दिसत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून वार्ड नुसार मतदार याद्यात  छेडछाड करण्यात आली आहे. व प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचना व नियम धाब्यावर बसवले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांन कडुन घेण्यात आलेल्या आक्षेपांकडे डोळे झाक करत,  लोकशाहीला काळीमा फासण्याचे कृत्ये केले आहे. कुठल्याही प्रकारचा आक्षेप नसताना भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदासाठी इच्छुकांची नावे अंतिम मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत. त्याच बरोबर पक्ष विचाराला मानणाऱ्या अनेक मतदारांना इतरत्र  प्रभागात स्थलांतरित करण्यात आले आहे.  दबावाच्या राजकारणाला खतपाणी घालण्यासाठी शहराच्या शेजारील खेडे गावांमधील लोकांचा शहरातील प्रभागात समावेश करण्यात आला आहे. एकुण घटनाक्रम पाहता सामान्य मतदाराचा मतदानाचा हक्क हिरावण्याचे कारस्थान केले जाते आहे. या विरोधात भारतीय जनता पार्टी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे.असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पुढे पत्रकारांना माहिती देताना राम शिंदे म्हणाले की, 

सामान्य जनतेमध्ये  भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त होताना दिसत आहे. कर्जत शहराचा अनेक वर्षापासून चा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवला गेला आहे. आशिया खंडात उल्लेखनीय अशी स्मशानभूमी कर्जत शहरासाठी उभारण्यात आली आहे. शहरासह उपनगरातील सर्व रस्त्याना प्राधान्य देत  काँक्रीटीकरणच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांवर व प्रत्येक घराच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे . शहराच्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वाहतूक सुविधा व अग्निशमन सारख्या गरजेच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. कर्जत शहराला  वैभवशाली व सौदर्यवाण बनवण्याचे काम समर्थ गार्डन, व शहा गार्डनच्या माध्यमातून केले आहे. संत सदगुरू गोदड महाराज मंदिर परिसर, बाजार तळ,यासह सर्व परिसरात  सुसज्ज पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले आहे. गरजेच्या ठिकाणी शहर व उपनगरात चौक सुशोभिकरण करण्यात आले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शहर व उपनगरात अनेक बंधारे बांधले गेले आहे. सामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेऊन विकासात्मक कामास प्राधान्याने न्याय दिल्याचे जनतेतून ही बोलले जात आहे. या सर्व गोष्टींचा लोकप्रतिनिधींनी धसका घेतल्याचे दिसून येत आहे. म्हणून राजकीय दबावाने ,शासकीय अधिकाऱ्यां मार्फत  मतदार यादीत छेडछाड करणे व  शहरालगतच्या खेडेगावातील मतदारांचा दहशती साठी समावेश करणे म्हणजे या गोष्टी मधुन शहरातील सामान्य जनतेचा मतदानाचा हक्क हिरावण्याचे पाप केल्या चा सुरू जनतेतून उमटतो आहे. खरं तर सर्व सामान्य नागरिकांची इच्छा आहे की जर लोकप्रतिनिधींची खरोखर नैतिकता जिवंत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या आयारामांना सोडून कर्जत नगरपंचायत ची निवडणूक लढवुन दाखवावी. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या मुद्द्यावर कीती नगरसेवक निवडून येतात हे दाखवून देणे जनतेला अपेक्षित आहे . मात्र विकासाला फाटा देत कुटील, कपटी,खुनशी, दहशतीच्या, राजकारणाच्या माध्यमातून सामान्य जनतेला भिती दाखवण्यात लोकप्रतिनिधी धन्यता मानताना दिसत आहेत, हे कर्जतकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र कर्जत शहरातील सुज्ञ नागरिक जनता आता भुल थापांना चांगल्या प्रकारे ओळखुन चुकली आहे. त्यामुळे मी केलेल्या विकासाला साथ देत  जनता ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर हाती घेणार आहे असे एकूण चित्र दिसते आहे. तर दहशत, दबाव, खुनशी राजकारणला जनता आता खपवून घेणार नाही आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी तत्पर राहील असा विश्वासही राम शिंदे यांनी बोलून दाखविला.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment